Gram Sanvad Cycle Yatra

महात्मा गांधीजींप्रमाणे स्वयंशिस्त, सत्य व प्रामाणिकपणा अंगिकारा – इति पाण्डेय

सामाजिक विशेष

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या १२ दिवसीय ‘ग्राम संवाद सायकल यात्रे’स आरंभ; महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त करण्यात आले आयोजन

जळगाव : ‘महात्मा गांधीजींप्रमाणे स्वयंशिस्त, सत्य आणि प्रामाणिकपणाच्या मार्गाने चालले तर, आपण खरे असल्याचे आपल्याला सिद्ध करण्याची आवश्यकता भासत नाही. खोट्याचे अनेक चेहरे असतात परंतु सत्याचा एकच चेहरा असतो असे म्हटले जाते. गांधीजींच्या सहज सोप्या तत्त्वज्ञानाचा अंगिकार आपण करावा, असे मोलाचे विचार मध्य रेल्वेच्या (Central Railway) विभागीय व्यवस्थापक (DRM) इति पाण्डेय यांनी व्यक्त केले.

महात्मा गांधी (Mahatma Gandhi) पुण्यतिथी (हुतात्मा दिनी, दि. ३० जानेवारी) निमित्ताने स्वस्थ समाज व सामाजिक समरसता निर्माण करण्याच्या उद्देशाने समाज प्रबोधनासाठी व गांधी विचार प्रचार-प्रसारासाठी गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे “ग्राम संवाद सायकल यात्रा” (Gram Sanvad Cycle Yatra)आयोजण्यात आली आहे. या यात्रेस DRM इति पाण्डेय यांच्याहस्ते हिरवा झेंडा दाखवून आरंभ झाला. याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी सहभागी सायकल यात्रींसह उपस्थितांना जैन इरिगेशन (Jain Irrigation) सिस्टीम्स लि. चे अध्यक्ष अशोक जैन यांनी स्वच्छता संबंधीत प्रतिज्ञा दिली.

कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर जैन इरिगेशन (Jain Irrigation) सिस्टीम्स लि. चे अध्यक्ष तथा गांधी रिसर्च फाऊंडेशनचे विश्वस्त अशोक जैन, गांधी रिसर्च फाउंडेशन (Gandhi Research Faundation)च्या डाॅ. गीता धर्मपाल, डाॅ. अश्विन झाला आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलतांना DRM पाण्डेय म्हणाल्या की, माझ्या व्यक्तीगत जीवनात मी महात्मा गांधीजींच्या अनेक तत्त्वांचा अंगिकार करत असते. माझ्या दिवसाची सुरुवात प्रार्थनेने होते. आपल्या उद्दिष्टांना साध्य करण्यासाठी वाम मार्गाचा अवलंब न करता मेहनत व प्रामाणिकपणा खूप महत्त्वाचा ठरतो. या यात्रेच्या माध्यमातून असंख्य लोकांपर्यंत चांगला संदेश तुम्ही घेऊन जावे, रस्त्याने सायकल चालवितांना सुरक्षीतपणे सायकल चालवावी, असेही आवाहनही त्यांनी केले.

या सायकल (Gram Sanvad Cycle Yatra) यात्रेत विविध राज्यातील आणि स्थानिक अशा ४० स्वयंसेवकांचा सहभाग आहे. १२ दिवसांच्या या यात्रेच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी, शिक्षक, महिला व नागरिकांशी संवाद साधला जाईल. जळगाव जिल्ह्याच्या दक्षिण-पूर्व भागातील सात तालुक्यातून जवळजवळ ३५० किमीचा प्रवास या यात्रेचा असणार आहे. यात्रेत शाळा / महाविद्यालयात दोन दैनंदिन कार्यक्रम असतील तर रात्री मुक्कामाच्या ठिकाणी जनजागृतीबाबत जाहीर कार्यक्रम देखील संपन्न होणार आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या व प्रजासत्ताक अमृत महोत्सवी वर्षाच्या औचित्याने तयार करण्यात आलेली प्रदर्शनी कार्यक्रमांच्या ठिकाणी मांडली जाणार आहे. निरोगी, सशक्त समाजाच्या निर्मितीच्या उद्देशाने या यात्रेत प्रबोधन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक मिश्रा यांनी केले.

स्वच्छतेबाबत दिली प्रतिज्ञा…
कार्यक्रमात जैन इरिगेशन (Jain Irrigation) सिस्टीम्स लि. चे अध्यक्ष अशोक जैन (Ashok Jain) यांनी सहभागी सायकल यात्रींसह उपस्थितांना स्वच्छता संबंधीत प्रतिज्ञा दिली. मी प्रतिज्ञा करतो की – मी सत्य, अहिंसा, प्रेम, शांती, बंधुता, सद्भाव, सहकार्य आणि पवित्रता यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन. मी स्वतः आरोग्य आणि स्वच्छतेबाबत जागरुक राहीन. मी कचरा टाकणार नाही आणि इतर कोणालाही कचरा टाकू देणार नाही. या संस्कारांची सुरुवात मी स्वतःपासून करून माझे गाव स्वच्छ आणि पवित्र धाम बनवेन आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन करून त्यास नंदनवन बनवीन.
मी माझ्या शरीराची पवित्र अशा मंदिराप्रमाणे काळजी घेईन आणि कोणत्याही प्रकारचे व्यसन करणार नाही. निरोगी आणि सशक्त समाजासाठी एक जबाबदार नागरिक म्हणून मी माझे कर्तव्य सदैव पार पाडीन. सर्व रोगांवर एकच औषध, घरा-घरातील स्वच्छता ! स्वच्छ सुंदर परिसर, जीवन निरोगी निरंतर ! स्वच्छते विषयीची प्रत्येक कृती, देईल सामाजिक आरोग्याला गती ! जो करते है योग, वही हमेशा रहते है निरोग… अशी प्रतिज्ञा यावेळी देण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत